2-सूर्य,चंद्र व पृथ्वी-
खालील ठळक मुद्द्यांचे काळजीपूर्वक वाचन करा आणि सर्वात खाली चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
◆चंद्राच्या गती
पृथ्वीप्रमाणेच चंद्राला सुद्धा अक्षीय आणि कक्षीय अशा गती असतात.
चंद्र हा स्वतःभोवती फिरताना पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो तेव्हाच पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते त्यामुळे चंद्र सूर्याभोवती स्वतंत्रपणे फिरत नसला तरी तो पृथ्वीभोवती फिरता फिरता अप्रत्यक्षपणे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालत असतो.
चंद्राच्या परिभ्रमण आणि परिवलन गतीचा कालावधी हा सारखाच असतो,त्यामुळे आपल्याला चंद्राची नेहमी एकच बाजू दिसत असते.
◆ चंद्राची उपभू आणि अपभू स्थिती
पृथ्वीप्रमाणे चंद्राची परिभ्रमण कक्षा लंबवर्तुळाकार आहे त्यामुळे चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना पृथ्वी व चंद्र यांमधील अंतर हे सतत बदलत असते.
जेव्हा चंद्र आपल्या प्रदक्षिणा मार्गामध्ये पृथ्वीच्या जास्तीत जास्त जवळ असतो तेव्हा त्या स्थितीला चंद्राची उपभू स्थिती म्हणतात.
जेव्हा चंद्र त्याच्या पृथ्वीभोवतीच्या प्रदक्षिणा मार्गात पृथ्वीपासून जास्तीत जास्त दूर असतो त्या स्थितीला चंद्राची अपभू स्थिती म्हणतात.
◆ चंद्रकला
चंद्रकला म्हणजे चंद्र बिंबाचे प्रकाशित होणारे भाग होय.हे भाग चंद्रावरून परावर्तित होणाऱ्या सूर्यकिरणांमुळे आपल्याला दिसतात. चंद्राच्या कक्षीय गती मुळे त्याचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग दररोज कमी-जास्त होत असतो चंद्राचा पृथ्वीवरून दिसणारा प्रकाशित भाग अमावस्या पासून पौर्णिमेपर्यंत क्रमाक्रमाने वाढत जातो आणि पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत क्रमाक्रमाने कमी होत जातो.
आपल्याला दिसणाऱ्या चंद्राच्या प्रकाशित भागाच्या दररोज बदलत जाणाऱ्या आकाराला चंद्रकला म्हणतात.
चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना पौर्णिमेला सूर्याच्या विरुद्ध बाजूस असतो त्यामुळे पौर्णिमेला चंद्र पूर्ण गोल दिसतो .
अमावस्येला चंद्र हा पृथ्वी व सूर्य यांच्यामध्ये येतो त्यामुळे अमावस्येला चंद्र दिसत नाही.
शुद्ध व वद्य अष्टमीला चंद्र, पृथ्वी व सूर्य यामध्ये 90° कोन असतो. त्यावेळी आपल्याला चंद्राच्या प्रकाशित भाग अर्धा दिसतो त्यामुळे शुद्ध व वद्य अष्टमीला चंद्र अर्धवर्तुळाकार दिसतो.
◆ ग्रहणे
●पृथ्वीची परिभ्रमण कक्षा व चंद्राची परिभ्रमण कक्षा
पृथ्वीची परिभ्रमण कक्षा आणि चंद्राची परिभ्रमण कक्षा नेहमी एकाच पातळीमध्ये नसतात. चंद्राची परिभ्रमण कक्षा पृथ्वीच्या परिभ्रमण कक्षेशी सुमारे 5 ° कोन करते.त्यामुळे चंद्र प्रत्येक परिभ्रमणा दरम्यान पृथ्वीचा परिभ्रमण प्रतलाला दोन वेळा छेदतो.
● अमावस्या व सूर्य ,पृथ्वी आणि चंद्र यांना सांधणारी रेषा
प्रत्येक अमावस्येला सूर्य, पृथ्वी व चंद्र या तीन खगोलांचा क्रम सूर्य ,चंद्र ,पृथ्वी असा असला तरी प्रत्येक अमावस्येला या तिन्ही खगोलांना सांधणाऱ्या रेषेत 0 अंशाचा कोन असत नाही.
● पौर्णिमा व सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांना सांधणारी रेषा
प्रत्येक पौर्णिमेला सूर्य, पृथ्वी व चंद्र या तीन खगोलांचा क्रम सूर्य ,पृथ्वी चंद्र असा असला तरी प्रत्येक पौर्णिमेला या तीन खगोलांना सांधणाऱ्या रेषेत 180 अंशाचा कोन असत नाही.
●प्रत्येक अमावस्या व पौर्णिमा ग्रहणे न होण्याचे कारण
प्रत्येक अमावस्येला व पूर्णिमेला सूर्य पृथ्वी आणि चंद्र एका सरळ रेषेत व एकाच पातळीत येत नाही म्हणून प्रत्येक अमावस्या व पौर्णिमा ग्रहण होत नाही.
●ग्रहणे व सूर्य पृथ्वी आणि चंद्र यांची स्थिती
काही अमावस्या व पौर्णिमेला सूर्य पृथ्वी व चंद्र एका सरळ रेषेत आणि एका पातळीत येतात अशावेळी ग्रहणे होतात.
ग्रहणे सूर्याच्या व चंद्राच्या संदर्भातच घडतात.
◆ सूर्यग्रहणे
पृथ्वी व व सूर्य यांच्या दरम्यान चंद्र आल्यामुळे चंद्राची सावली पृथ्वीवर पडते या स्थितीत हे तीनही खगोल एका सरळ रेषेत व समपातळीत असतात.
त्यामुळे दिवसा चंद्राची सावली पृथ्वीवर ज्या ठिकाणी पडते तेथून सूर्यग्रहण अनुभवता येते. चंद्राची सावली ही दोन प्रकारे पडते मध्य भागामध्ये दाट असते आणि कडेच्या भागात ती विरळ असते.
पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची सावली पडते तेथून सूर्य पूर्णपणे झाकलेला दिसतो ही स्थिती म्हणजेच खग्रास सूर्यग्रहण.
खग्रास सूर्यग्रहण फार थोड्या भागातून अनुभवता येते पृथ्वीवरील ज्या भागात चंद्राची विरळ सावली पडते तेथून सूर्य अंशतः लागलेला दिसतो ही स्थिती म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहण होय. काही वेळा चंद्र पृथ्वीपासून अपभू स्थितीमध्ये असतो त्यावेळी चंद्राची दाट सावली पृथ्वी पर्यंत पोहोचत नाही व ती आकाशातच संपते त्यामुळे अशावेळी पृथ्वीवरील अगदी थोड्या भागातून सूर्याची केवळ प्रकाशाने व्यापलेली कडा एखाद्या बांगडीप्रमाणे दिसते यालाच कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात.कंकणाकृती सूर्यग्रहण क्वचितच दिसते.
◆चंद्रग्रहणे
चंद्र व सूर्य यांच्या दरम्यान पृथ्वी एकाच पातळीत आल्यास चंद्रग्रहण घडते. चंद्र आपल्या परिभ्रमण मार्गातून जाताना जेव्हा पृथ्वीच्या छायेमध्ये प्रवेश करतो तेव्हा चंद्रग्रहण होते.
पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणामार्ग पृथ्वीच्या दाट सावली मधून जातो दाट सावलीमुळे चंद्र पूर्णपणे झाकला गेल्यास खग्रास चंद्रग्रहण होते. पौर्णिमेच्या रात्री चंद्राचा प्रदक्षिणा मार्ग पृथ्वीच्या दाट सावलीतून जातो त्यामुळे चंद्र अंशतः झाकला गेल्यास खंडग्रास चंद्रग्रहण होते.
◆ सूर्यग्रहणाची वैशिष्ट्ये
सूर्यग्रहण फक्त अमावस्येला होते परंतु ते प्रत्येक अमावस्येला होत नाही.
सूर्य,चंद्र आणि पृथ्वी हे अनुक्रमे एका सरळ रेषेत एका पातळीत असल्यावरच सूर्यग्रहण होते. खग्रास सूर्यग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी हा 7 मिनिटे 20 सेकंद एवढा असतो.
◆चंद्रग्रहणाची वैशिष्ट्ये
चंद्रग्रहण पौर्णिमेला होते.परंतु ते प्रत्येक पौर्णिमेला होत नाही.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र हे अनुक्रमे एका सरळ रेषेत व एका पातळीत असल्यावर चंद्रग्रहण होते. खग्रास चंद्रग्रहणाचा जास्तीत जास्त कालावधी एकशे सात मिनिटे इतका असतो.
कंकणाकृती चंद्रग्रहण कधीच दिसत नाही. कारण चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्राच्या आकारमानापेक्षा पृथ्वीचे आकारमान मोठे आहे व चंद्र पृथ्वीच्या जवळ आहे त्यामुळे चंद्रग्रहणाच्या वेळी पृथ्वीची दाट सावली चंद्रापर्यंत न पोहोचता अवकाशात संपेल अशी स्थिती उदभवू शकणार नाही. यामुळे चंद्रग्रहण कधीही कंकणाकृती दिसणार नाही.
◆ ग्रहण एक खगोलीय घटना
आपल्या सामाजिक चालीरीती मध्ये, बऱ्याच जुन्या परंपरांमध्ये ग्रहण हे अपशकुन मानले जाते. परंतु सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण हा केवळ खगोलीय स्थितीचा भाग आहे.
यात शुभ-अशुभ असे काही नसते.
सूर्य ,पृथ्वी आणि चंद्र यांच्या विशिष्ट स्थितीत येण्याचा हा एक परिणाम आहे.
या खगोलीय घटना नेहमी घडत नसल्याने त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये साहजिकच कुतुहल निर्माण झालेले असते.
◆ ग्रहण अभ्यासाची पर्वणी
शास्त्रज्ञांच्या मते ग्रहणे व त्यातही खग्रास सूर्यग्रहण आणि कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणजे अभ्यासाची एक पर्वणी असते .
ज्या भागात ग्रहण दिसणार असेल तेथे जगभरातील खगोल शास्त्रज्ञ एकत्र येतात आणि या ग्रहणाचा अभ्यास करतात
◆सूर्यग्रहण पशुपक्ष्यांचा प्रतिसाद
सूर्यग्रहणाच्या कालावधीत अचानक निर्माण होणाऱ्या काळोखामुळे अनेक पक्षी आणि प्राणी गोंधळतात त्यांच्या जैविक घड्याळ पेक्षा वेगळी घटना घडत असल्यामुळे त्यांचा या घटनेला मिळणारा प्रतिसाद हा वेगळा असतो.
◆ सूर्यग्रहण दक्षता
सूर्यग्रहण पाहणे ही एक शास्त्रज्ञ आणि सर्व सजीवांना ,मानवांना एक पर्वणी असते. सूर्यग्रहण पाहताना आपण काही खबरदारी आवश्य घेतली पाहिजे .
सूर्यग्रहण पाहताना काळी काच किंवा विशिष्ट प्रकारचे गॉगल्स वापरणे अत्यंत आवश्यक असते. सूर्याचे प्रखर प्रकाशामुळे डोळ्यांना इजा होऊ शकते.
त्यामुळे सूर्यग्रहण कधीही उघड्या डोळ्यांनी पाहू नये.
इयत्ता सातवी- भूगोल
२- सूर्य ,चंद्र व पृथ्वी चाचणी सोडविण्यासाठी -- ➤➤ क्लिक करा
No comments:
Post a Comment