■ मुघलांशी संघर्ष
खाली दिलेल्या ठळक मुलांचे काळजीपूर्वक वाचन करा
आणि सर्वात खाली या घटकावरील चाचणी सोडविण्यासाठी क्लिक करा.
◆ शिवाजी महाराज यांनी आदिलशाहीशी यशस्वी संघर्ष केला होता. परंतु स्वराज्याचा विस्तार करायचा असेल तर मुघलांशी संघर्ष करणे अटळ होते. स्वराज्याचा विस्तार जस जसा होऊ लागला तसतसा स्वराज्यावर मुघलांचे संकट आले. मुघलांकडून आपले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे यासाठी शिवरायांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला आणि दक्षिणेची मोहीम हाती घेतली.
◆ शायिस्ताखानाची स्वारी
फेब्रुवारी 1660 मध्ये शाहिस्ताखान अहमदनगर येथूनन निघून पुणे प्रांतांमध्ये आला. त्याने आसपासच्या प्रदेशांमध्ये आपलं सैन्य पाठवून प्रदेशाची खूप हानी केली चाकणच्या किल्ल्याला वेढा दिला.
चाकण किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा यांनी शाहिस्तेखानाच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला परंतु शेवटी शाहिस्ताखान याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला.
● शिवाजी महाराजांचे बालपण ज्या ठिकाणी गेले त्या पुण्यातील लाल महालात शाहिस्ताखान तळ ठोकून बसला.त्याने आजूबाजूच्या मुलखातील प्रदेशाची लूट केली. दोन वर्ष तो पुण्यात मुक्काम करून राहण्याच्या विचार करत होता.अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांनी एक धाडसी बेत आखला.
● शिवाजी महाराजांनी स्वतःचे नेतृत्वात लाल महालावर गुप्तपणे छापा टाकण्याची एक योजना आखली. त्यानुसार 5 एप्रिल 1663 रोजी महाराजांनी रात्रीच्या वेळी काही निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला. यामध्ये शाहिस्तेखानाची बोटे तुटली. त्याची खूप मानहानी झाली आणि त्याने पुणे सोडले आणि मुक्काम औरंगाबादला हलवला. या प्रकारामुळे शाहिस्तेखानाने औरंगजेबाची नाराजी ओढवून घेतली .औरंगजेबाने त्याला बंगालच्या सुभ्यावर पाठवले.
खानावरील या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवर सुद्धा झाला आणि शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वावर प्रजेचा विश्वास वाढला.
◆ सुरतेवर स्वारी
शाहिस्ताखान यांनी तीन वर्षाच्या काळात स्वराज्याचा बरेच प्रदेश उद्ध्वस्त केला होता आणि खूप नुकसान झालेले होते याची भरपाई करणे अत्यंत आवश्यक होते. त्यासाठी शिवाजी महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना केली.
मुघलांच्या ताब्यात मध्ये सुरत हे एक मोठे व्यापारी केंद्र होते. ते शहर बादशहाला सर्वात जास्त महसूल देत होते आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न होते म्हणून शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी केली.
सुरतेचा सुभेदार इनायतखान महाराजांच्या या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही आणि सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी सुरत वर स्वारी करून खूप मोठ्या प्रमाणात संपत्ती मिळवली.यामुळे औरंगजेब बादशहाच्या प्रतिष्ठेला धक्का बसला.
◆ जयसिंगाची स्वारी
शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग या आपल्या मातब्बर राजपूत सरदाराला पाठवले. तो पुण्यामध्ये आला त्याने महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.गोवा वसईचे पोर्तुगीज, वेंगुर्ल्याचे डच, सुरतेचे इंग्रज, जंजिराचे सिद्धी यांनी महाराजांविरुद्ध एक आरमारी मोहीम काढावी असे जयसिंग यांनी या सर्वांना सुचवले.
शिवाजी महाराज कडील किल्ले जिंकून घेण्याचा या सर्वांनी बेत आखला. स्वराज्याच्या विविध भागात मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. त्यामुळे स्वराज्याची खूप मोठी हानी झाली.
महाराजांनी मोगलांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेरखान पुरंदर किल्ल्यास वेढा दिला.
पुरंदराच्या वेढ्याच्या वेळी मुरारबाजी देशपांडे यांनी पराक्रमाची शर्थ लढवली. परंतु त्याला या लढाईमध्ये वीर मरण आले.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शिवाजी महाराजांनी जयसिंग अशी बोलणी करण्याचे ठरवले आणि जयसिंग व महाराज यांच्यात जून 1665 मध्ये एक तह झाला हा तह पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो.
● पुरंदरच्या तहानुसार महाराज त्यांनी
मुघलांना तेवीस किल्ले आणि त्याच्या भोवतालचा वार्षिक चार लक्ष होन उत्पन्नाचा प्रदेश दिला.
आदिलशाहीविरुद्ध मुघलांना मदत करण्याचे आश्वासन सुद्धा दिले.
या तहास औरंगजेबाने सुद्धा मान्यता दिली.
◆ आग्रा भेट व सुटका
पुरंदरच्या तहानंतर जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहिम हाती घेतली आणि या कार्यात महाराजांनी जयसिंगास मदत केली. परंतु ही मोहीम यशस्वी झाली नाही.
महाराजांना दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवण्यासाठी जयसिंह यांनी एक बेत आखला आणि औरंगजेब बादशहा यांच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यास जावे असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. त्यांच्या सुरक्षिततेबद्दल बद्दलची हमी देखील दिली.
● ठरल्याप्रमाणे शिवाजी महाराज आग्र्याला निघाले त्यांच्यासोबत राजपुत्र संभाजी तसेच विश्वासू आणि जीवास जीव देणारे काही निवडक सहकारी होते. शिवाजी महाराज आग्रा पोहोचले तथापि औरंगजेबाने दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही त्यामुळे महाराजांना संताप आला त्यांनी बादशहाचा महाल सोडून दिला.
बादशहाने शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवले. शिवाजी महाराज या कृत्यातून डगमगून न जाता महाराजांनी नजर कैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली.
शिवाजी महाराज आग्र्याहून शिताफीने निसटले आणि काही दिवसातच महाराष्ट्रामध्ये सुरक्षितपणे पोहोचले. आग्र्याहुन येताना संभाजीराजे यांना त्यांनी मथुरा येथे ठेवले होते ,पुढे ते सुद्धा सुखरूप राजगडावर पोहोचले. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार वीर माता जिजाबाई आणि महाराजांचे सहकारी यांनी सांभाळला.
◆ मुघलांविरुद्ध आक्रमक पवित्रा
महाराजांना मुघलांबरोबर लगेच संघर्ष नको असला तरी पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले आणि प्रदेश परत मिळवणे हे महाराजांचे उद्दिष्ट होते.
त्यासाठी त्यांनी एक व्यापक आणि धडाडीची योजना तयार केली. एका बाजूला निरनिराळ्या किल्ल्यावर जय्यत तयारीनिशी सैन्य पाठवले व किल्ले घेण्याचे ठरवले तर दुसऱ्या बाजूला दख्खनमध्ये मुघलांच्या प्रभुत्व खाली असलेल्या प्रदेशावर हल्ले करून तेथे अस्थिरता निर्माण करण्याचे धोरण ठरवले.
त्यानुसार त्यांनी मुघलांच्या अहमदनगर आणि जुन्नर या प्रदेशावर हल्ले केले. पुढे एकापाठोपाठ सिंहगड,पुरंदर, लोहगड, माहुली,कर्नाळा आणि रोहिडा हे किल्ले जिंकून घेतले.
◆ शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा सुरतेवर स्वारी केली. तेथून परत येताना नाशिक जिल्ह्यातील वणी दिंडोरी या ठिकाणी त्यांचा मुलांबरोबर संघर्ष झाला. या संघर्षात त्यांनी दाऊदखान या मुघल सरदाराचा पराभव केला. त्यानंतर मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक जवळ त्र्यंबकगड जिंकून घेतला.अशारीतीने महाराजांनी मुघलांविरुद्धच्या लढाईमध्ये यश मिळवले.
या लढाईच्या मोहिमांमध्ये तानाजी मालुसरे, मोरोपंत पिंगळे, प्रतापराव गुजर इत्यादी सरदारांनी मोलाची कामगिरी केली.
या मोहिमेचे वर्णन कृष्णाजी अनंत सभासद या बखरकाराने पुढीलप्रमाणे केले आहे
चहू महिन्यात सत्तावीस गड घेतले. मोठी ख्याती केली.
◆ राज्याभिषेक
शिवाजी महाराजांनी सतत तीस वर्षांच्या अविश्रांत परिश्रमातून मराठ्यांचे स्वराज्य साकार केले होते तथापि स्वराज्याचे स्वतंत्र अस्तित्व व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी या स्वराज्याला अधिकृत आणि सर्व मान्यताप्राप्त होणे आवश्यक होते,
हे महाराजांच्या लक्षात आले त्यासाठी त्यांनी विधीवत राज्याभिषेकाची आवश्यकता आहे असे ठरवले आणि 6 जून 1674 या दिवशी विद्वान पंडित गागाभट्ट यांच्या हस्ते रायगडावर स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला.
![]() |
रायगड |
या राज्याभिषेका द्वारे महाराज आता स्वराज्याचे छत्रपती झाले सार्वभौमत्वाचे प्रतिक म्हणून त्यांनी राज्याभिषेक शक ही नवी कालगणना सुरु केली. राज्याभिषेक प्रसंगी त्यांनी सोन्याचा होन व तांब्याची शिवराई ही खास नाणी पाडली.
या नाण्यावर श्री राजा शिवछत्रपती असे अक्षरे कोरलेली होती. तेथून पुढे राजपत्रावर
क्षत्रियकुलावंतस श्री राजा शिव छत्रपती असा उल्लेख होऊ लागला. राज्याभिषेकानंतर त्यांनी फारसी शब्दांना पर्यायी संस्कृत शब्द असणारा एक कोश तयार करून घेतला याला राज्यव्यवहारकोश असे म्हणतात.
◆ मध्ययुगीन भारतामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही एक क्रांतीकारी घटना होय असे महत्व सांगतांना सभासद म्हणतो.
मऱ्हाटा पातशाह एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.
● यानंतर महाराजांनी अल्पावधीत 24 सप्टेंबर 1674 रोजी निश्चलपुरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला.
भारतात वैदिक आणि तांत्रिक अशा धर्म कृत्याच्या दोन परंपरा अस्तित्वात होत्या, त्यांचा आदर करून शिवाजी महाराजांनी या दोन्ही पद्धतीने राज्याभिषेक करून घेतला.
● शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी युवराज संभाजी राजे 17 वर्षाचे होते.
त्यांनी बुधभूषण ग्रंथात राज्याभिषेकाच्या समारंभाचे वर्णन केले आहे. ते त्यांच्या स्वतःच्या अनुभवावर आधारित आहे.
● छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक महोत्सवाच्या वेळी निरनिराळ्या प्रांतातून विद्वान आले होते. त्यांना वजनमाप किंवा मोजदाद न करता विपुल धन देऊन वस्त्रे ,हत्ती-घोडे यांचेही दान करून संतुष्ट करण्यात आले होते.
◆ दक्षिणेची मोहीम
शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानंतर सुमारे तीन वर्षांनी ऑक्टोबर 1677 मध्ये दक्षिणेची मोहीम हाती घेतली.
गोवळकोंडा मध्ये त्यांनी कुतुबशाहाची भेट घेतली. त्याच्याबरोबर मैत्रीचा तह करून पुढे महाराजांनी कर्नाटकातील बंगळुरू, होसकोटे तसेच तामिळनाडूतील जिंजी व वेल्लोर इत्यादी किल्ले आणि आदिलशाही चा काही भाग जिंकून घेतला.
त्यांच्या फौजेने देशाच्या कुठल्याही प्रजेला त्रास दिला नाही .जिंकलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी मुख्य कारभारी म्हणून रघुनाथ नारायण हणमंते यांची नेमणूक केली.
◆ शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी हे सध्याच्या तामिळनाडूमध्ये असलेल्या तंजावर येथे राज्य करत होते. त्यांनाही आपल्या स्वराज्याच्या कारभारात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला.
व्यंकोजी राजे यांच्या पश्चात तंजावरच्या राजांनी विद्या
आणि कला यांची जोपासना केली.
तेथील सरस्वती महाल हे ग्रंथालय जगप्रसिद्ध आहे.
◆ दक्षिणेच्या मोहिमेत तामिळनाडूतील जिंजी चा किल्ला जिंकून तो स्वराज्याला जोडण्याच्या शिवाजी महाराजांच्या कृतीला पुढील काळात निर्णय महत्त्व प्राप्त झाले.
मुघल बादशहा औरंगजेब स्वराज्य नष्ट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात ठाण मांडून बसल्यामुळे तेव्हाचे छत्रपती राजाराम महाराज यांना सुरक्षितेसाठी महाराष्ट्र सोडावा लागला. त्यावेळी त्यांनी दक्षिणेतील याच जिंजी किल्ल्यावर आश्रय घेऊन तिथून स्वराज्याचा कारभार चालवला.
![]() |
महाराजांची समाधी |
◆ शिवाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय नंतर थोड्याच अवधीत 3 एप्रिल 1680 रोजी त्यांचे रायगडावर निधन झाले.
वयाच्या पन्नाशीतील त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली.
एका महान युगाचा अस्त झाला.
चाचणी सोडविण्यासाठी -क्लिक करा
Aarya amol shinde
ReplyDeleteBest
ReplyDelete